बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

कडेलोट !

आज वाटले इतक्या लवकर रात सरली ... आभाळ निळावले 
पण कुशीतून तुझ्या मोकळे होण्यास मन आळसावले ...

सांगत होते अगतिक मन अजून फिटली नाही हौस 
झेलूदे चार हाताच्या ओंजळीत हा दवाचा पाउस  

झटकून मोकळे केस उठून लगबगीने कुठे जासी ?
झालो आहे ह्या मोहरानात मी वनवासी ...

शोधात होत्या अनंत काळ तुला माझ्या चुरगळलेल्या नजरा ..
हातात उरला होता तुझ्या सुगंधाने घमघमणारा गजरा ...

समजावले मनाला .. चला भरायचे आहे पोट ...
पुन्हा एकदा ........ मी माझाच केला कडेलोट ...

बुधवार, १५ डिसेंबर, २०१०

नुसतेच !

काल रात्री उशिरापर्यंत काम करत असताना, माजघरातून अचानक कुजबुज ऐकू आली ....
पाहिलं तर जुने कोपरे, कोनाडे स्वताशीच काहीतरी कुजबुजत होते ...
कान देऊन ऐकल ... देत होते मला शिव्या काढत होते खोट ...
गेली बरीच वर्ष त्यांना विसरून नुसतेच भरतोय खिसे, नुसतेच भरतोय पोट ...

मला म्हणाले ... आठवतंय का तुझ रुसून कोपर्यात बसण ...
आणि आई ने कान धरले कि गालात खुदकन हसण ...
आता फार मोठा झालास ... घरातही वावरतोस साहेब म्हणून ...
रुसलास कि काय बुआ... आता जातोस घर बीर सोडून ...

अजूनही मागे वळून बघ आईने धरले आहेत कान
तू जरी नाही आलास तरी रोज वाढते तुझे जेवायचे पान
तुझे जेऊन झाल्यावर त्याच उष्ट्या ताटात जेवायची तुझी माय
आता कधी विचारतोस का तिला ... तुझे जेवण झाले काय ?

आमचे इतकेच म्हणणे आहे आमच्याशी दोन शब्द बोल
जवळ येऊन बघ कधी ... भेगा पडल्यात किती खोल


वाटले खूप बोलावे ... करावे मोकळे मन ... पण नुसतेच थरथरले ओठ
खरच ... गेली बरीच वर्ष त्यांना विसरून नुसतेच भरतोय खिसे, नुसतेच भरतोय पोट ...

मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

अजून एक रात्र

त्या रात्री स्वप्नाच्या राज्यातली एक नदी तिच्या डोळ्यात उतरली होती ...
त्या रात्री वेगळेपणाची सगळी जाणीव पूर्णपणे सरली होती ...

उरले नव्हते कुठलेही पाश, न उरली कुठलीही आस ...
वाटले मिटून घ्यावे डोळे .... तू असता अशी पास

भरून घ्यावा तुझा गंध, जपून ठेवावा तुझा स्पर्श
असाच होत राहावा दोन मनाचा अन दोन देहाचा परामर्ष

अचानक भंगले स्वप्न, उरली ती फ़क़्त रिकामी उशी ...
तुझ्याही शेजारी असेल का ग ती ...... तशी ?

नकळत गालांवर पाण्याची रेष उमटली ...
असेल का ग तुझीही उशी अशीच ओली ?

विषय बदलावा म्हणून कूस बदलली
विषय बदलावा म्हणून कूस बदलली
अन अजून एक रात्र तशीच .... सरली ........

सोमवार, १३ डिसेंबर, २०१०

आज पुन्हा ...

आज बर्याच दिवसांनी तिचाकी वाहनात बसून तुळशीबाग मधील श्रीकृष्ण भुवन मध्ये मिसळ खाण्याचा योग आला ...
कार्यालयातून तिचाकी वाहनातून प्रस्थान केले ... आणि लकडी पूल ओलांडला तेव्हा असे वाटले जणू काही वर्तमान काळातून भूतकाळात प्रवेश केला ...
सगळ्या जुन्या आठवणींची चित्रफीत काही क्षणात डोळ्यासमोरून झर्रकन निघून गेली ... अचानक सगळे कृष्ण-धवल दिसू लागले ...

पांढरा सदरा, खाकी विजार घातलेला मी ... आई बरोबर काकाकुवा मेन्शन च्या वीज बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे दिसलो ...
वीज बिल भरून झाले कि अगत्य मधील डोसा किवा उभ्याचा वडा हा ठरलेला अल्पोपहार असायचा ... फ़क़्त त्या लालसेपोटी मी वीज बिल भरायला उत्सुक असायचो ...
आणि वडील बरोबर असले कि श्रीकृष्ण ची मिसळ ... पावले आपोआप श्रीकृष्ण कडे वळत होती ...
माझ्या पुढून छोटा मी वडिलांच्या बरोबरीने जात होतो ... तुळशीबागेतील आजूबाजूंच्या दुकानांमधील रंगीत आरास पाहून माझे लहान डोळे नेहमीच चमकून जायचे ...
श्रीकृष्ण मध्ये नेहमीप्रमाणे गर्दी असली कि वडील मला लाईन मध्ये उभे करून रुमाल/पट्टा इ. खरेदी उरकून घ्यायचे....
आम्ही आत शिरलो ... टूमकन उडी मारून मी माझी जागा पटकावली ... आणि मिसळ फस्त करण्यासाठी सगळी इंद्रिये उत्सुक झाली ...
मनसोक्त मिसळ खाल्ल्यावर ... खरतर नेहमीची सवय ... जोगेश्वरी च्या बोळातून बाहेर अप्पा बळवंत चौकात यायचे ...
वडील रसिक साहित्य वाचनालयमध्ये पुस्तक बदलायला आणि मी कराची मध्ये लस्सी प्यायला ....
आज .... फ़क़्त मिसळीवर भागवून पटकन परतीच्या प्रवासाला लागलो ... पुन्हा तिचाकी मध्ये बसून ...

परतताना ... जेव्हा पुन्हा लकडी पूल ओलांडला तेव्हा जाणवले ...
हा पूल साधासुधा नसून जुन्याला नव्याशी जोडणारा आहे ... दोन पिढ्या मधील दरीवर बांधलेला .....
ह्या पुलावर दुचाकींना/लहान वाहनांना परवानगी नाही ... जणू काही जुन्याने नव्याचे स्वागत मोठ्या मनाने करावे सांगणारा ...
एक लहान मुलगा आईचा हात सोडून पुलाच्या कठड्यावरून खाली पाण्यात मास्यांना स्वताच्या खाऊ मधला एक राखून ठेवलेला वाटा टाकत होता ...
तो माझ्याकडे पाहून जोरात हात हलवत हसला .... माझाही हात नकळत प्रतिसादासाठी उठला ... पण इतके निरागस आणि शुद्ध हसू काही फुटले नाही ....

पूल ओलांडला ... पुन्हा वर्तमानात परतलो ... मागे वळून पहिले ... सगळे धूसर दिसत होते ...
डोळ्यावरील भूतकाळाचा ओलावा टिपला ... आणि भावनाहीन होऊन पैसे छापायचा घाणा पुन्हा सुरु केला ...

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०१०

भार ...

तुझ्या मनी विचारांचे काहुर माजता,
त्याचे पडसाद दिसती माझ्या मुखावर

तुझ्या श्वासाश्वासात असे माझा प्राणवायु,
तुझे हे जगणे करी मजला दीर्घायु

माझ्या मनी विचारांची खळबळ माजता,
तुझ्या मुखातून झिरापते माझीच कविता

तुझ्या आनंदात माझे स्मित दडे,
तुझ्या प्रसन्नतेत माझा उत्साह ओसंडे

तुला वाटते दोन देहांची गरज न काही,
भार एकाचाही मज सहन होत नाही

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

बेत

कविवर्य सुरेश भटांच्या ह्या ओळींवरून प्रेरणा मिळाली -


मनाप्रमाणे जगावयाचे किती छान बेत होते...
नकळत आयुष्य मात्र वेगळीच वाट चालत होते
सापडला किनारा म्हणून जरा विसावलो ...
तर ते मृगजळ मला पाहून हसत होते

भेदरलो शोधू लागलो परतीची वाट
चाचपून पहिला आधारासाठी धरलेला हात
तो हात बहुदा कधीच सुटला
अन एकाकीपणाच्या नुसत्या जाणीवेने काळजाचा ठोका चुकला ...

घातली साद त्या दिलाबरास पुन्हा पुन्हा
उमगले नाही काय घडला गुन्हा ...
वाटले संपवावे हे जीवनाचे समर तितक्यात ....
दूरच्या मशिदीत घुमले अल्लाहू अकबर


कुठे राहिले समाधान

मला पुन्हा एकदा लहान व्हायचे आहे ..
मला पुन्हा एकदा चिंब भिजायचे आहे ...

पुन्हा चोरायचा आहे डब्यातून लाडू,
पुन्हा विनवायचे माळ्याला 'एकच कैरी पाडू' ?

पुन्हा रंगवायचे आहेत हात ... निळे शाईमध्ये
पुसायचे हात शर्टाला ... खेळायच्या घाईमध्ये

पुन्हा धरायचा हट्ट कुत्राच्या पिल्लासाठी,
आणि चोरायचे मावळे ... आपल्या किल्ल्यासाठी

पुन्हा घालायची शिळ तिच्याकडे पाहून ..
थांबायचे पाहत ... ती पाहते का वळून ...

पुन्हा जायचे पार्किंग मध्ये चुकवून नजरा ...
पळून जायचे ठेवून तिच्या गाडीवर गजरा ....

होते स्वप्न व्हावे मोठे ... कधी नसावे लहान ...
वाटे जिंकुनिया जग व्यापावे पंचप्राण
आता उमगत नाही ... कुठे राहिले समाधान... कुठे राहिले समाधान...


बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

Agile Life Management - Generation Gap

Prerequisite -Agile(SCRUM) ची तोंड ओळख आणि SDLC चे न्यान.

Project Management चे हे दोन प्रकार आहेत - SDLC आणि Agile (त्यातले specific SCRUM) ह्या बद्दल जास्त माहिती इथे वाचा -


मूळ मुद्दा ह्यांच्यावर बोलणे नाही परंतू काही महिन्यांपूर्वी मी Certified SCRUM Master झालो तेव्हा माझी ओळख SCRUM शी झाली. आणि त्या दिवशीपासून मला SDLC आणि SCRUM हे केवळ प्रोजेक्ट करता वापरल्या जाणाऱ्या प्रणाली नसून आपल्या आयुष्याशी बरेच साम्य वाटले.

माझ्या आई वडिलांच्या generation ने आयुष्यभर SDLC वर प्रेम केले. साचेबद्ध आयुष्य जगले प्रत्येक गोष्टीचे आधी Requirement Analysis केले, Design केले, Execution केले. आयुष्यातल्या प्रत्येक लहान आणि मोठ्या आनंदाचे, celebration चे, सणांचे, कार्याचे, मुलांच्या शिक्षणाचे, त्यांच्या लग्नाचे planning केले, budgeting केले. आजही माझ्या वडिलांना त्यांच्या १० वर्षापूर्वीच्या पगाराचे break-up माहिती आहे, basic किती ? hra किती ? etc. मला माझ्या आजच्या पगाराचा फ़क़्त in hand माहिती आहे. साहजिक आहे... वडिलांच्या पगाराच्या प्रत्येक रुपयावर देणेकर्याचे किवा इंदिरा विकासचे नाव लिहिले होते. मला अजून आठवते, माझी आजीचा अगदी ४ वर्षापूर्वीपर्यंत (म्हणजे जिवंत असे पर्यंत) महिन्याचा औषध कोटा ठरलेला असायचा pension मधला.

आणि आज माझी अवस्था अशी आहे कि रोजचा दिवस ढकलायचा ... रोजचे हिशेब जुळवायचे ... रात्री online balance चेक करायचा आणि उद्याचे उद्या बघू असे म्हणून झोपायचे. काही वर्षांपूर्वीपर्यंत (३-४ वर्षांपूर्वी) हे असे विकली चालायचे, म्हणजे week-end to week-end असा हिशेब असायचा. मग पगार वाढले, खर्च वाढले (खरं तर वाढवले), गरजा वाढल्या म्हणजे unexpected गरजा वाढल्या, planned गरजा त्यांच्या जागी होत्याच (home loan , LIC etc.). पण हळू हळू week चे दिवसांवर आलो. आणि हे फ़क़्त आर्थिक दृष्ट्या नाही तर सगळ्याच बाबतीत. अहो मला आठवते माझ्या आई बाबांचे भांडण झाले कि कधी कधी आठवडाभर अबोला असायचा. आजकालच्या पती पत्नीचे काय ... सगळे मिटवायचे झोपायच्या आत.. त्या च्या त्या दिवशी ... कारण शांत झोप आवश्यक आहे, दुसऱ्या दिवशीच्या लढाई साठी. उगाच झुरत झुरत रात्री काढायला वेळ नाही कि energy नाही. (आवश्यक नाही पण डोम्बिवली Fast चा ओपेनिंग सीन आठवून पहा, रोज तेच तेच दळायचे... म्हणजे जगायचे. आजकालच्या पिढीच अगदी असे झाले आहे आणि इतक्या पराकोटीला पोचले आहे कि आता त्यांच्या आयुष्यात surprises सुद्धा तीच असतात expected and predictable)

अजून काही प्रातिनिधिक उदाहरणे इथे लिहितो -

१. दिवाळी सोने खरेदी करण्यासाठी २ वर्ष आधीपासून दर मुहूर्ताला १ ग्राम सोने घेणे. गाडगीळ किवा नगरकरांकडे सुवर्ण संचय भिशी हि प्रत्येक गृहिणी ची ठरलेली Savings ची method होती. आज बरेच जण प्रयत्न करतात सुवर्ण संचय करायचा. दुसऱ्याच महिन्यात उरलेल्या सगळ्या महिन्यांचे PDC दिले जातात किवा काही extream केसेस मध्ये पैसे देखील तसेच मध्ये सोडून दिले जातात, कोण हजार दोन हजारचे हिशोब ठेवतो?

२. दिवाळी ची तयारी अगदी १५ दिवस आधीपासून आमच्या घरी असायची पूर्वी. घरी कंदील करणे, फराळ करणे, किल्ला करणे, फटक्याचे quotations आणणे (कुठे सगळ्यात स्वस्त आहेत वगैरे...) असे बरेच उद्योग आई वडील मागे लावून द्यायचे. आता दर वर्षी नवा कंदील तो पण ready made, फटके जवळच्या दुकानातून (कितीही महाग मिळाले तरी), plastic चा किल्ला (ह्या वर्षी मी ४०० रुपयांची प्रतापगड ची प्रतीकुती पहिली plastic ची) अहो कारण सुट्टी दोनच दिवस आहे. त्यातला एक दिवस jet lag मध्ये जातो. जसा आमचा प्रत्येक week-end जातो ना तसा.

३. माझ्या आईने सगळ्या आप्तेष्टांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, इतर महत्वाचे दिवस एका वहीत टिपून ठेवले आहेत आणि आता इतके वर्ष ती वहि refer केल्याने बरेचसे पाठ झाले आहेत, अजूनही मला आईकडून reminders येतात (तोंडी) कि अरे उद्या अमुक अमुक चा वाढदिवस आहे. मला सोडा पण माझी आई कोणाच्या लग्नाचा वाढदिवस असेल तर त्यातील नवऱ्याला हळूच आदल्या दिवशी फोन करून आठवण करून देते... उद्या लग्नाचा (कितवा वगैरे) वाढदिवस आहे. Height of planning. आम्हाला facebook, orkut, skype असल्या महाभागांनी आठवण करून दिली आणि अगदी वेळ, मूड सगळे जुळून आले आणि तिथेच reply/wish असे button असेल तर आम्ही करतो बुवा विष. कारण माहिती असते समोरच्यालाही इतके काही पडलेले नसते आपल्या शुभेच्छांचे.

अशी मी अनेक उदाहरणे जगतो आहे ... ती generation gap कि काय म्हणतात ना ते म्हणजे खरं फ़क़्त
Change in Life Management Methodology आहे.

आम्ही ह्या युगातील Certified SCRUM Master आहोत. काही लोक Daily Sprint मध्ये आहेत तर काही Weekly.

Just out of curiosity - तुमच्या आयुष्याची Sprint Cycle काय ?

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

श्री गणेशा - लिमिटेड माणुसकी

माणुसकी ... हे काय असते बुआ?

आज जेव्हा मला थोडी उसंत मिळाली तेव्हा उमगले कि चाकोरीबध्द आयुष्यामधून माणुसकीची गरजच संपत चाललेली आहे. स्वतःवरचा आंधळा आत्मविश्वास, देवावर अविश्वास असल्याचा गर्व, आधुनिक विचारसरणी (independent), तसल्याच आधुनिक कविता, कल्पना विश्वात नेवून भेसूर सत्य अधिक गडद रंगविणारे साहित्य, ह्या सगळ्यामुळे माणुसकीचा रंग फिक्कट पडत गेला ...

आणि मग मी रजनीकांत च्या रोबो चित्रपटाची कथा वाचली कुठल्याश्या ब्लोग वर, चित्रपट पाहण्याचे कष्ट आणि विषाची परीक्षा नको म्हणून. तुम्ही हसाल पण हीच माझी प्रेरणा आहे ह्या पहिल्या खरडीची.

मी आणि माझा रोबो :

आजची पिढी पहिली कि मला जाणवते खरच आज आपण अचाट शक्ती असलेले, असाध्य ते सध्या करणारे रोबो बनलो आहोत आणि बनवतो आहोत. (मी बनवतो हा शब्द मुद्दाम वापरला कारण अजूनही मला संभ्रम आहे कि आपण घडवितो कि बनवितो ?)
च्यायला पोरगा जन्माला आला कि वजन किती ... मग कोणाचे किती असते? ideal किती असले पाहिजे? मग कमी असेल तर काय? जास्त असेल तर काय ? पालथा कधी पडणार? रांगणार कधी? उभा कधी रहाणार? चालाणार कधी? बोलणार कधी? दात कधी येणार? आला बरका वर्षाचा वाढदिवस grand झाला पाहिजे, return gift काय आहे ? मग आतापासून त्याला social करा, घरी आई, आजी, आजोबा असले तरी पाळणाघरात ठेवा, हेच वय आहे शिस्त लावायचे, अहो स्वताच्या हाताने खाल्ले पाहिजे आता, potty training झाले नाही वाटत अजून ? playgroup मध्ये घाला आता, (शाळेतून updates) फार रडतो, डबा स्वताच्या हाताने खात नाही, sharing ची सवय नाही, चप्पल स्वताची स्वतः घालत नाही ...

मला प्रश्न पडतो आपण माणसाचे पोर वाढवत आहे कि रोबो तयार करत आहे ? जो पुढे जाऊन असेच चाकोरीबध्द independent आयुष्य जगेल, जगू शकेल ? (barely be able to survive)

असे असेल तर मला खरच माझ्या पोरामध्ये बाहेरून माणुसकी पेरता येईल का? (installation, plugin etc?)
अगदी चित्रपटात दाखवली आहे तेवढी नाही ... पण लिमिटेड ? लिमिटेड माणुसकी ?